Breaking News

भारती प्रतापराव पवार यांचे निधन

 

पुणे -  ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारती पवार या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. त्यांचे बालपण मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांनी बालमोहन विद्या मंदिरातून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि रुईया महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेतील विशेष आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९७० मध्ये त्यांचा विवाह प्रतापराव पवार यांच्याशी झाला.

सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड होती. पुण्यात आल्यावर त्या ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय होत्या. औंध येथील बालकल्याण संस्थेत त्या ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिल्या आणि विश्वस्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली. संस्थेतील अनेक मुलांना त्यांनी चित्रकलेचे धडे दिले. तसेच, ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळांमध्ये त्या विश्वस्त होत्या आणि तिथल्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत.

त्यांच्या पश्चात मुलगा आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, मुलगी अश्विनी, सून, नातवंडे असा परिवार आहे.